Followers

Tuesday, September 24, 2024

आया

 _*आया -*_


       माझं बालपण खेड्यात गेलं... एकत्र मोठं कुटुंब होतं त्यामुळे प्रेमाला काही कमी नव्हती सगळे लाड करायचे. खेड्यात असूनही सगळे सुशिक्षित होते त्यामुळे शिक्षण हेच ध्येय होतं. माझं आणि भांवडांचं दहावीपर्यंत शिक्षण गावीच झालं आणि शहरात स्वतःच एक घर घेऊन पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला तिथे पाठवण्यात आलं. आमच्याबरोबर काळजीवाहू म्हणून काकू रहात होती. सगळ्या सुखसोई करून दिलेल्या होत्या. आमचं कॉलेज जीवन सुरु झालं.....

      मी सॉफ्टवेअर इंजिनियर झाले व मला चांगल्या कंपनीत जॉब लागला. दहा लाखाचं पॅकेज  मिळालं. सगळेच खूप आनंदी झाले. एव्हाणा आमच्या खेड्याचंही रूप बदलून शहरी झाले होते. बोलणं, राहणीमान पुढारल्याने थोडासा गर्व आलाच होता.

       माझी भांवडं पण जॉब ला लागली होती. काही तर परदेशीं गेले... आता वेळ आली होती माझ्या लग्नाची. अर्थातच माझ्याही अपेक्षा खूप होत्या.  माझ्यापेक्षा पॅकेज जास्त असावं, त्याचा स्वतःचा बंगला, गाडी असावी, बॅंक बॅलन्स, एनव्हेसमेंट असावी व घरी आम्ही दोघंच असावेत, घरचे इतर कोणीही नको. फक्त तो राजा आणि मी राणी...

      अपेक्षेप्रमाणे स्थळं बघून आई, पप्पा व घरचे कंटाळले. कुठे मुलगा आवडत होता तर त्याची परिस्थिती नाजूक होती आणि चांगली असली तर मुलगा आवडायचा नाही. अशात माझं वय 30 झालं होतं. मी आर्थिक प्रगती खूप केली होती. अशातच माझ्या कंपनीत अमेरिकेतून आलेला एक भारतीय मुलगा जाॅईन झाला. दिसायला अगदी हँडसम होता. बघताक्षणी तो मला आवडला. हळू हळू ओळख झाली... मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

       त्यांच्याविषयी मी घरी सांगितलं. सगळे खुश झाले‌. खूप थाटामाटात लग्न लावून दिलं. कशाचीच कमी नव्हती. लग्न करून गावी गेलो, पूजा झाली आणि हनिमून साठी स्विझरलँड ला गेलो. दोघांची एक महिन्याची रजा होती. खूप समाधान आणि आनंद ओसंडून वहात होता. दोघांचे विचार जुळत होते. मन एकरूप झालं होतं. जणूकाही एक आत्मा आणि दोन शरीर असेच एकरूप झालो होतो....

      सुट्टी संपली आणि आम्ही घरी आलो. घरी दोघंच होतो. रोज जॉब आणि सुट्टीच्या दिवशी घरी. एकमेकांना वेळ देणं बस... एक दिवस मी बाहेर असतांना खूप मळमळ व्हायला लागली. थोडीशी चक्कर आली. डोळ्यांना अंधारी आली. काहीच सुचेना. मी घरी आले व अभि ला, म्हणजे माझ्या नवऱ्याला कॉल केला. तो लगेच आला व मला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. डॉक्टर म्हणाले, "घाबरण्यासारखं काही नाही, तुम्ही "आई" होणार आहात...

      मला व अभी ला खूप आनंद झाला.

घरी कळवलं. सगळे आनंदात भेटायला आले. येतांना खायला पौष्टिक लाडू करून आणले, काळजी घ्यायला सांगितली व ते पुन्हा गावी परत गेले. 

      नऊ महिने पूर्ण झाले होते. कधीही डिलेव्हरी होईल असं डाॅक्टरांनी सांगितलं. रात्री अचानक पोटात कळा यायला लागल्या व मला हॉस्पिटल मध्ये नेलं‌. सिझर झालं आणि गोड गोंडस गोरीपान मुलगी झाली...

      बस आता एकच मुलगी वाढवायची असा निर्णय आम्ही घेतला. ती एक वर्षाची होईपर्यंत मी सुट्टी घेऊन घरी राहिले. तरीही एक आया होती तिला सांभाळायला, न्हावूमाखू घालायला. तिचा बाळाला लळा लागला होता म्हणून मी बिनधास्त होते. आता कामाचा व्याप वाढला होता. दोघांनाही वेळ मिळत नव्हता. बाळालाही वेळ देता येत नव्हता...

       अशू, म्हणजे माझी मुलगी पाच वर्षांची झाली. तिचं सगळं काही आया करत होती. पण अशू एकटी पडत चालली होती, अगदीच हट्टी झाली होती. कुणाचंही ऐकत नव्हती. तिला थोडा बदल हवा म्हणून मीं एकदा सुट्टी काढून गावी गेले. तिथे माझ्या जावेची मुलं खूप शांत, समजदार, नाती जपणारी, सर्वांचे आदर सन्मान करणारी सुसंकृत मुलं दिसली. त्यांना बघून मला खूप वाईट वाटलं. कदाचित माझी मुलगी आज्जी आजोबांबरोबर राहिली असती तर अशीच घडली असती. कुटुंबात जे वळण लागतं ते चार भिंतीच्या आत आया कडून कसं लागेल.

      मी अभी ला म्हणाले अशू करता मी गावी रहाते, जॉब सोडते. पण अशू ऐकायला तयार नव्हती‌. आज्जी आजोबांना घेऊन जाऊ असं तीला म्हणाले तर आपल्या घरी एक आज्जी (आया) आहे, मला तिच हवी, असं म्हणाली. माझ्या दोघांनीच रहावे या निर्णयामुळे हातातून वेळ निघून गेली होती. पैसा तर आया ला गेला होता पण मुलगी हाताबाहेर गेली होती. आता फक्त पच्छाताप उरला होता....      

     आता अशू कॉलेज मध्ये जात होती. तिला मित्र मैत्रिणी होत्या पण सगळेच बिघडलेले. अगदीच बघवत नव्हतं. पण चूक आमचीच होती. पैसा आणि प्रतिष्ठा कमावण्याच्या नादात संस्कृती हरवली होती.

      अशू एक दिवस परस्पर लग्न करून घरी आली. मुलगा ड्रग्ज घेत होता. बघून खूपच त्रास झाला. आता पैसा असूनही उपयोगी येणार नव्हता. आज माणूस, आपलं माणूस हवं होतं असं मनाला वाटून गेलं.....

     अभी ला हे सारं सहन झालं नाही‌. अटॅक येऊन तो जागीच गेला. माझ्या डोळ्यापुढे अंधार पसरला होता..... आज पैसा, प्रतिष्ठा सगळं होतं पण इज्जत राहिली नाही हेच खरं होतं.....

      सगळं दान करायचं, आश्रमात जाऊन रहायचं आणि तिथे सेवा करायची असं मी ठरवलं, कारण गावी तर जाऊ शकत नव्हते. काय तोंड घेऊन जाणार.... लग्नासाठी मी घातलेल्या अटीची मला लाज वाटत होती. आज जर माझे सासू सासरे माझ्या सोबत असते तर आज्जी आजोबांच्या संस्कारात मुलगी वाढली असती आणि हे दिवस बघावे लागले नसते. पगारी आया या पैसा घेऊन कामं करणाऱ्या असतात. त्या काय मुलांना वळण, संस्कार लावणार.....

      अनुभवातून मला हेच सांगायचंय की नाती जपा. आपल्या मुलांना पाळणा घर किंवा आया नकोय, आज्जी आजोबांची छत्रछाया हवी. संस्काराची शिदोरी फक्त आज्जी आजोबाच देऊ शकतात. तेंव्हा आयुष्यभर पुरेल एवढा पैसा, प्रतिष्ठा तर हवीच, त्याच बरोबर नाती आणि संस्कार ही हवेत, तेंव्हाच संस्कृती टिकेल हे लक्षात असु द्या....

     मी चुकले, तुम्ही चुकू नका. आई वडिलांनी शिकवलं म्हणून आपण  प्रतिष्ठा मिळवली, प्रगती केली. जसे आपल्या आई वडिलांनी कष्ट केले तसेच सासू सासऱ्यांनी पण केलेले असतात, म्हणून नवरा क्लासवन अधिकारी होतो, म्हणून त्यांना मान द्या, सन्मान करा आणि पुढची पिढी सुसंस्कारी घडवा, तरच शेवट छान होईल, नाहीतर आहेच माझ्यासारखं वृद्धाश्रमी जीवन.

      आणि हो.... अशू कुठे आहे, काय करते, माहित नाही. ती जिवंत आहे की नाही तेही माहित नाही. मी गेलेल्या वेळेच्या आणि पैशाच्या नादात मुलीला वेळ न दिल्याचा फक्त पश्चाताप करत बसते, दुसरं माझ्या हाती काही नाही.

शिक्षण घ्या पण गर्व करू नका.

 _

No comments:

Post a Comment

साभार एक विमर्श.... यूं तो #भारत ने दुनिया को बहुत कुछ दिया है

 साभार एक विमर्श.... यूं तो #भारत ने दुनिया को बहुत कुछ दिया है।लेकिन आज #योग और #आयुर्वेद पर चर्चा कर रहे हैं।ऐसे माहौल में जब #एलोपैथी ने ...